Tuesday 15 April 2014

***** कळकळीची विनंती *****

सर्व श्रीस्वामीभक्तांना सादर नमस्कार !

मी या लेखाद्वारे एका अतिशय महत्त्वाच्या व गंभीर बाबीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो. श्रीनृसिंह सरस्वती स्वामींचे गुप्त होण्याचे व श्रीस्वामी समर्थ महाराजांचे प्रकट होण्याचे स्थान म्हणून आंध्रप्रदेशातील " कर्दळीवन " या स्थानाचा सध्या खूप गवगवा केला जात आहे. अनेक भोळ्या भाबड्या स्वामीभक्तांना खोटी-नाटी माहिती सांगून भावनिक ब्लॅकमेल करून, त्यांची दिशाभूल करून, या कर्दळीवनाच्या यात्रेच्या नावाखाली भक्तांची आर्थिक, मानसिक व भावनिक फसवणूक सध्या खूप मोठ्या प्रमाणावर होताना दिसते आहे. अनेक पुस्तके छापून, त्यांच्या विविध भाषांतील आवृत्या काढून व भरमसाठ पैसे घेऊन कर्दळीवनाच्या यात्रा काढून त्यातून प्रचंड पैसे कमवण्याचा मोठा धंदा सध्या बोकाळलेला आहे. स्वामीभक्तांना यातील तथ्य सांगण्यासाठी हा लेखनप्रपंच !

श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात नाही तर श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्या लिंगात अदृष्य होऊन श्रीदत्तलोकात प्रकट झाले होते. याला श्रीगुरुचरित्रात पुरावे आहेत. तसेच श्रीस्वामी समर्थ महाराज हस्तिनापूर जवळील छेली या खेडेगांवी चैत्र शुद्ध द्वितीयेला इ.स. १०७१ मध्ये प्रकट झाले होते. श्रीस्वामीसुत महाराज त्यांचा जन्मोत्सव देखील साजरा करीत असत. या वर्णनानुसार श्री. नानाजी रेखींनी केलेल्या श्रीस्वामींच्या पत्रिकेला स्वत: श्रीस्वामी महाराजांनी मान्यता दिलेली होती.

श्रीनृसिंह सरस्वती स्वामी व श्री स्वामी समर्थ महाराज हे जरी श्रीदत्तप्रभूंचेच अवतार असले तरी त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये पाहता, ते पूर्णपणे भिन्न अवतार ठरतात. तसेच श्रीस्वामी समर्थ महाराज १०७१ मध्ये प्रकटले व श्रीनृसिंह सरस्वती तेराव्या शतकात. म्हणजे श्रीस्वामी समर्थ हे श्रीनृसिंह सरस्वती स्वामींच्याही आधीपासून कार्यरत होते. त्यामुळे श्रीनृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाले व ३०० वर्षे तपश्चर्या करून लाकुडतोड्याच्या निमित्ताने श्रीस्वामीरूपात प्रकटले, या कथेला कोणताही सांप्रदायिक आधार नाही. अनेक अधिकारी स्वामीशिष्य ही कथा पूर्णपणे कपोलकल्पितच मानतात.
आज जे कर्दळीवन दाखविले जाते, तो मूळचा वामाचारी बौद्ध तांत्रिकांचा व शाक्त कापालिकांचा अड्डा होता. आजही त्यांचे धागे-दोरे तेथे आहेतच. अशा स्थानांवर संन्याशांनी जाऊ नये, अशी शास्त्राज्ञा असताना हे दोन्ही दत्तावतारी महात्मे तेथे तपश्चर्या करण्यासाठी राहिले होते, ही गोष्ट पटण्यासारखी नाही.

कलियुगाचा महिमाच असा आहे की, त्यात खोट्या गोष्टींना सत्य मानले जाऊन ऊत येतो. कर्दळीवन प्रकरण हा त्याचाच नमुना असून आपल्या व्यावसायिक फायद्यांसाठी लुच्च्या लोकांनी त्याला खोटी प्रसिद्धी दिलेली आहे. आता तर त्या सरकारी अभयारण्य म्हणून घोषित झालेल्या कर्दळीवनाचा विकास (?) करण्याच्या नावाखाली देश-विदेशातून भरमसाठ देणग्या मिळवून स्वत:ची तुंबडी भरण्याचाही भयंकर उद्योग काहींनी राजरोस सुरू केलेला आहे. श्रीस्वामी भक्तांनी असल्या कोणत्याही भूलथापांना, प्रलोभनांना बळी पडून कर्दळीवनाच्या निरर्थक यात्रा करून स्वत:ची फसवणूक करून घेऊ नये, हीच कळकळीची विनंती.


वरील माहिती श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या कृपा परंपरेतील थोर सत्पुरुष, प. पू. श्री. शिरीषदादा कवडे यांच्या प्रवचनातून घेतलेली असून पूर्णत: सत्य व दत्तसंप्रदायाला धरून आहे. जिज्ञासू वाचकांनी अधिक माहितीसाठी कृपया खालील संदर्भ आवर्जून वाचावेत ही विनंती.

1. " कृष्णातिरीच्या वसणाऱ्या " - प्रवचन- प. पू. श्री. शिरीषदादा कवडे, श्रीवामनराज त्रैमासिक कार्तिक अंक, श्रीवामनराज प्रकाशन, पुणे-५१.
2. " कर्दळीवनाची वस्तुस्थिती " - लेख- रोहन उपळेकर, ग्रहसंकेत मासिक एप्रिल अंक, नवीन प्रकाशन, पुणे ३०. (ग्रहसंकेत मासिकात आलेला हा लेख "या इथे क्लिक केल्यावर वाचता येईल")

 सर्व स्वामी भक्तांना कळकळीची विनंती की, ही माहिती जास्तीतजास्त शेयर करून अधिकाधिक स्वामीभक्तांपर्यंत पोचवून, या सध्या चालू असलेल्या प्रचारकी फसवणुकीला हकनाक बळी पडण्यापासून वाचवावे ही प्रार्थना !

No comments:

Post a Comment